गीतरामायण नावाचा एक अविस्मरणीय चमत्कार मराठी मध्ये होऊन गेला …
मुळात रामायण हा भारतीय संस्कृतीचा आत्मा… लहानपणी राम-कृष्णाच्या गोष्टी आजी-आजोबांकडून न ऐकलेला जीव सापडणं कठीणच … आणि अशा अजरामर कथेला शब्द आणि सुरांच्या जादुगारांचा परिस-स्पर्श झाला कि गीत-रामायण नावाचे अमृत निघत असते …
हजार वर्षातून अशी एखादीच कलाकृती तयार होत असते कि ज्याच्या अनुभवाने स्वत जगन्नियत्याने सुद्धा मुग्ध होऊन जावे आणि माणूस नावाचे रसायन तयार केल्याबद्दल स्वतःच स्वताची पाठ थोपटून घ्यावी …
गदिमा म्हणाले होते, आम्ही गीतरामायण तयार केलं नाही … ते आमच्याकडून त्याने करून घेतलं आहे … किती नम्र आणि तरी सच्चे शब्द आहेत हे … हे मर्त्य मानवाचं काम असूच शकत नाही … या साठी प्रतिभेचे वरदान आणि दैवतांचे आशीर्वाद असलेच पाहिजेतच … आणि असा हा अवीट गोडीचा ठेवा आम्हाला दिल्याबद्दल आम्ही आमच्या कातडीचे जोडे करून दिले तरी गदिमांचे आणि बाबूजींचे ऋण फिटणार नाहीत… मला ते फेडायचेहि नाहीत … काही कर्ज परतफेडीसाठी नसतातच … आईच दुध आणि सूर्याचे तेज यांचा हिशोब मांडायच्या भानगडीत न पडलेलच बरं , हो ना ??
असो, तर आज-कालच्या यो यो हनी सिंगच्या जमान्यात कदाचित हा लेख अप्रस्तुत वाटेल पण तरी गीतरामायणातील मला आवडलेल्या - भावलेल्या निवडक गाण्यांविषयी मी इथे बोलणार आहे …
प्रतिक्रिया जरूर कळवाव्या …
गीत १ -
कुश लव रामायण गाती …
स्वयें श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती
कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती
राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रुपें आकारती
ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल
वसंत-वैभव गाते कोकिल
बालस्वराने करुनी किलबिल
गायनें ऋतुराजा भारिती
फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
कर्णभूषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती
सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ-मंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती
पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहतां निजजीवनपट
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
प्रभुचे लोचन पाणावती
सामवेदसे बाळ बोलती
सर्गामागुन सर्ग चालती
सचिव, मुनिजन, स्त्रिया डोलती
आंसवें गाली ओघळती
सोडुनि आसन उठले राघव
उठुन कवळिती अपुले शैशव
पुत्रभेटिचा घडे महोत्सव
परि तो उभयां नच माहिती
गदिमांच्या प्रतिभेचा आणि कल्पनाशक्तीचा हा पहिला अविष्कार …रामाने सीतेचा त्याग करून बराच काल लोटला आहे…. आता राम सार्वभौम राजा होणार आहे, त्याच्या राज्याभिषेकासाठी आलेल्या लोकांमध्ये त्याचेच पुत्र आहेत … कुश-लव वाल्मिकींच्या आज्ञेने तिथे येउन रामचरित्र गाउन दाखवतायत … आणि कुश-लव यांना माहीत नाही कि हा आपलाच पिता आहे, रामालाही हे नातं नाहीत नाही … किती सुंदर योजना केली आहे बघा…
गदिमांना पुलं शब्दांचे जादुगार का म्हणायचे ते इथे समजतं …
कुश-लव यांना गंधर्वाची उपमा देताना "सजीव पुतळे रघुरायाचे" म्हणून किती समर्पक शब्द रचना केली आहे …
पुत्राने पित्याची स्तुती करणे याला "ज्योतिनें तेजाची आरती" या पेक्षा सुंदर शब्द दुसरे मिळणं शक्यच नाही हे आपल्याला तर पटलं बुवा … बाळांच्या कोवळ्या आवाजाला कोकिळेची किलबिल म्हणताना त्यांचा निरागसपणा नकळतपणे आपल्या मनात कोरला जातो …
समाज-जीवनाच्या संकेतांमध्ये अडकून रामाची होणारी घुसमट किती सुंदर व्यक्त केली आहे बघा ….
"पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहतां निजजीवनपट
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
प्रभुचे लोचन पाणावती"
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट म्हणताना दैवत्व वागवणाऱ्या रामाचे एकाकीपण आणि व्याकुळता किती सुंदर रीतीने त्याच्या आसवातून व्यक्त होती आहे …
हे अद्भुत गान ऐकून राम आपले आसन सोडून उठतो आणि त्या बाळांना कवेत घेतो … याला किती सुंदर शब्दात सांगितलं आहे … "उठुन कवळिती अपुले शैशव" ! रामाने त्याचेच बाल्य जणू कवटाळले !!… आहाहा !!!
रामायणाचे आद्यगीत म्हणून तर हे गीत लक्षात राहतेच पण त्यापेक्षा मला भावतो तो त्यातला साधा, सच्चा भावार्थ, प्रतिभेचा अप्रतिम अविष्कार आणि त्याची सुंदर सहज चाल … दुधामध्ये केशर असावं तसे शब्द आणि सूर सहजपणे मिसळून गेलेले … तरीही त्याचं स्वतंत्र अस्तित्व जपलेलं …
बाबुजींचा स्पष्ट तरीही भावपूर्ण स्वर (हे दोन्ही शब्द खर तर विरोधार्थी वाटतात पण एखादाच अवलिया दोन्ही गोष्टी सहजरित्या एकत्र आणू शकतो)… पेटी वर स्वतः बाबुजीच असल्याने स्वरांना शब्दांची सुरेख साथ … फक्त तबला आणि पेटी या जोरावर सुद्धा स्वरांचा स्वर्ग उभा करता येतो हे किती सहजतेने दाखवून दिल आहे या दोघांनी … शब्दांच्या सहज गेयतेवर आक्रमण न करता त्यांना चालीच्या कोंदणात बसावयाच कसब … भूप रागात उपजत असलेली भक्तिरसाची झाक आणि त्याला दिलेली किंचित नाट्याची जोड…
आणि हे सगळ करत असताना प्रत्येक गाण्याला, त्यातल्या प्रसंगांना न्याय देत यावा म्हणून किमान ८-१० कडव्यांच काव्य … काव्य लिहून झाल्यावर त्याला चाल दिलेली असल्याने त्यातून अधिक प्रभावीपणे पुढे येणारं नाट्य … सगळंच उत्तमात उत्तम …
देव प्रसन्न वगैरे होतो आणि वर देतो हे खरंच असावं … देवाने बाबूजी आणि गदिमांना एकाच काळात जन्माला घालून वरदानच दिलंय आपल्याला … नाहीतर एका अप्रतिम अनुभूतीला आपण कायमच मुकलो असतो …
गीतरामायणा सारख काहीतरी भव्य आपल्याला अनुभवत येतंय या साठी त्या देवाचे शत शत आभार … आणि एक विनंती, अशी माणसं बनवायचं बंद करू नकोस … भले दुसरे पुल, बाबूजी , गदिमा किंवा भीमसेन नाहीये आमच्या नशिबात, पण किमान आमच्या पुढच्या पिढ्यांना असे नवीन नवीन खजिने मिळावेत या साठी तथास्तु म्हणावेस हीच विनंती …