Tuesday, January 13, 2015

आकाशी झेप घे रे पाखरा …



बाबूजी नावाचं  एक रत्न मराठी सांगितला लाभलं … या एका गोष्टीसाठी म्हणून पुन्हा पुन्हा मराठी मातीत जन्माला यायला मी तयार आहे इतकी त्यांच्या गाण्यांची गोडी अवीट आहे …
आणि त्या रत्नांच्या खजीन्यातलं सगळ्यात अनमोल रत्नांपैकी एक म्हणजे "आकाशी झेप घे रे पाखरा"….

जगदीश खेबुडकरांचे शब्द, बाबुजींचा आवाज… त्यांनीच दिलेलं सुरेल असं संगीत …
निव्वळ तबला, पेटी आणि एक सुरेल आवाज मिळून एक सुंदर गाणं होऊ शकतं आणि ते श्रवणीयच नाही तर अविस्मरणीय ठरत … कदाचित यालाच प्रतिभा म्हणत असावेत … आणि हि देवदत्तच असावी लागते…

बाबुजींनी सावरकरांवर जीवापाड प्रेम केलं, नव्हे त्यांची भक्ती केली … आणि आज जर सावरकर जिवंत असते तर हे गाणं ऐकून आपल्या या भक्तावर बेहद्द खुश झाले असते …कर्मवाद प्रामाण्य मानणाऱ्या आणि आपले जीवन कर्मवादालाच वाहून घेणाऱ्या या गानयात्रीचे शब्द या गाण्यातून सरळ काळजाला येउन भिडतात …
एक नजर टाकली तरी लक्षात येईल कि किती मोठा संदेश, किती तळमळ हे शब्द सांगत आहेत…


आज मी आणि माझ घर यातच रमणारा जीव, त्याने या पाशातून मुक्त होऊन गगनभरारी घ्यावी … काहीतरी उत्तुंग, अचाट असे करून दाखवावे...
आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे आणि आई वडिलांच्या पुण्याईवर आयुष्य ढकलणारे यांना "स्व" जागा करण्याचे आवाहन करताना घराला कारागृहाची उपमा देणारे बाबूजी आपल्याला एका सत्याची पदोपदी जाणीव करून देतात …   तुमच्या "Comfort Zone" ला सोन्याचा पिंजरा म्हणताना त्यातून बाहेर येउन काहीतरी उत्तुंग अचाट करून दाखवा, त्यातूनच आयुष्याचा नवा अर्थ गवसेल असे सांगणारे कर्मवादी बाबूजी त्यांच्या सच्चेपणाने भावून  जातात …
आज आजू-बाजूला बघताना नोकरी आणि घर यातच रमणारे जीव , त्यांची इवली इवली स्वप्ने आणि "लिमिटेड" जगणं या कडे केविलवाण्या दृष्टीने बघणारे बाबूजी हे गाणं अक्षरशः जगले आहेत …. गाणं ऐकताना किंचित कापरा झालेला आणि भावनांनी भिजलेला स्वर याची साक्ष देत असतो …

कोल्हापूर मधून मुंबईला केवळ संगीताच्या ध्यासाने आलेले बाबूजी… मित्राच्या खोलीवर राहून जेम-तेम पैशात गुजराण करणारे आणि तरीही संगीतावरच प्रेम तसूभरही कमी न होऊ देणारे बाबूजी … गीत रामायणाच्या कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र पालथा घालणारे बाबूजी… सावरकर चित्रपटासाठी नवीन काम घेण्याच थांबवून झपाटल्या सारखे सावरकरांना वाहून घेणारे बाबूजी ….त्यांची उभी जीवनकथाच ते सांगताहेत असा भास होतो …


आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा…. ।।

तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा…. ।।

घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा उंबरा… ।।

तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा…. ।।

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा …।।

घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्‍नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा …।।

 आज आपल्या आजू बाजूला बघितले कि खेबुडकरांच्या - बाबूजींच्या द्रष्टेपणाची खात्री पटते … आपलं एवढसं विश्व तयार करून त्यात खोपटात राहिल्यासारखी लोकं बघितली कि आपली आपल्यालाच लाज वाटू लागते … नोकरी साठी पुण्यातून मुंबईला सुद्धा जायला कुरकुर करणारे मराठी बांधव, सगळे उद्योग धंदे गुजराती मारवाड्यांच्या ताब्यात गेले म्हणून गळा काढतात तेव्हा बाबूजींच्या आत्म्याला काय वाटत असेल ??

आज यशस्वी झालेल्या माणसांची नावे आठवून बघा … सचिन तेंडूलकर, अब्दुल कलाम, नरेंद्र मोदी, रजनीकांत, अमिताभ बच्चन, अंबानी … हे सगळे माझं घर, माझं घर करत बसले असते तर आज कुठे असते??

बाबुजींनी १९७४ मध्ये  दिलेला "काहीतरी करून दाखवा , स्वताची वेगळी ओळख तयार करा आणि त्यासाठी कष्टाची तयारी ठेवा"  हा  आपल्याला सगळ्यांना आज सुद्धा तेवढाच लागू पडतो …
याला बाबुजींचा द्रष्टेपणा म्हणायचं का आपलं दुर्दैव ??


1 comment:

  1. Superb chinmay... aaj ya gaanyakade paahanyacha nawa drushtikon milala... good thoughtful written

    ReplyDelete