Friday, April 17, 2015

तरुण आहे रात्र अजूनी …

माझ्या अत्यंत आवडीच्या आणि सुंदर गाण्यांपैकी हे एक गाणं आहे …

हे गाणं ऐकताना मी जादूचे खेळ बघणाऱ्या मुलासारखा होऊन जातो …

कल्पना करा … सुरेश भट नावाच्या एका अवलिया ने एका पोत्यातून सुंदर शब्दांची रत्ने काढावीत … आणि हृदयनाथ नावाच्या (ज्यांनी कोणी हृदयनाथ हे नाव ठेवलंय  त्याला देवाने कानात भविष्य हळूच सांगितले असावे… ) दुसऱ्या अवलियाने सुंदर नक्षीदार रांगोळीच्या कोंदणात अलगद सगळी रत्ने नेउन ठेवावी … आणि त्या प्रभावळीच्या  तेजाने आपण दिपून जात असतानाच कुठून तरी आशाचे सूर जणू सरस्वतीचे रूप घेऊन त्या प्रभावळीत विराजमान व्हावेत … सगळा स्वर्गीयच अनुभव … 


मी पहिल्यांदा हे गाणं ऐकलं ते कुठेतरी प्रवासाला जात असताना … २-३ तास यष्टीच्या बाकावर बसून कंटाळा आलेला… बाहेर मी म्हणणारं ऊन … अशा वेळी टाईमपास साठी मोबाईल वर गाणी लावली ,… अचानक आशाचा सूर कानी पडला आणि दिवसभर उपाशी असलेल्या भिकाऱ्याला अचानक पंचपक्वान्नांच जेवण मिळावे तसं वाटलं…

शृंगार हि हळुवार आणि अतिशय तरल अशी भावना … प्रत्येकाच्या अत्यंत जवळची, … पण आपल्या दुर्दैवाने भारतीय संगीतामध्ये शृंगार गीत हि सगळ्यांनी मिळून वाळीत टाकलेली गोष्ट … त्यामुळे मुळात शृंगार गीत मुळातच खूप दुर्मिळ (आज-कालच्या बिभत्स गाण्यांना मुळात गीताचा दर्जा देणंच जीवावर येतं, शृंगार गीत वगैरे तर खूपच दूरची गोष्ट झाली )…


आणि अशात सुरेश भटांसारखा एक दर्दी अवलिया असं काही लिहून जातो कि थक्क व्हावे … मुळात गझल हा प्रकारच दर्दभरा … त्यात एका शृंगार गीत आणि गझलेच्या स्वरुपात…

हे गाणं ऐकताना आशाचे सूर थेट हृदयाला भिडतात आणि मिटल्या डोळ्यांसमोर एका स्त्रीत्वाची कथा उभी राहते… 
भारतीय संस्कृती मध्ये मुळात स्त्रीला माणूस म्हणून दर्जाच कधी मिळाला नाही …  कपडे कोणते घालायचे हे सुद्धा तिने ठरवायचं नाही, मग शृंगार आणि प्रेम यांचा choice तर केवळ अशक्य … 
म्हणूनच तिची वेदना जेव्हा भटांचे शब्द, हृदयनाथांचे सूर आणि आशाचा स्वर घेऊन समोर येते तेव्हा आपण मंत्रमुग्ध होऊन जातो … 


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~  
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे


"तरुण आहे रात्र अजुनी ", अरे राजा माझ्या मनातल्या भावना अजूनहि तेवढ्याच तरुण, उत्कट आहेत, हि रात्र सुद्धा किती सुंदर आहे.
रात्रीच्या टिपूर चांदण्यांमध्ये रातराणीच्या सुगंधाच्या साथीने तू जवळ घ्यावेस असे वाटते रे … पण तूच जर पाठ फिरवून निजून गेलास तर मी आपलं मन मांडाव तरी कुठे ??  
म्हणूनच आर्त स्वरात मी विचारते आहे … "एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे"
 
शृंगाराचे उत्कट तरीही संयत वर्णन किती सुंदर रीतीने करता येते….  

"अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे


या  ओळीतला  "हाय " आशाताईंनी असा काही उच्चारला आहे कि आपणही नकळत "हाय " म्हणून जातो …





सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे "


"अरे माझ्या राजा, मीच नाही तर हे चांदणे, ते तारे आणि जी रात्र आपण दोघांनी मिळून सजवायची ती रात्र सुद्धा तुला विचारते आहे… तू असा मिटलास का रे ?"  वाह काय सुंदर शब्द आहेत …. 


आणि नंतर भटांनी इतकी सुंदर शब्दरचना केली आहे …

"बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे "


पहाटेची चाहूल घेऊन येणारा पश्चिमेचा गारवा विचारतोय, रातराणीच्या सुगंधाची लयलूट तू केलीस का रे ?? 
या ओळी गाताना आशाताईंनी आणि हृदयनाथ मंगेशकरांनी अक्षरशः कमाल केली आहे … "पश्चिमेचा गार वारा " हे शब्द इतक्या झपकन वर जातात कि अक्षरशः अंगावर काटा येतो… नुसत्या शब्दांमधून आणि स्वरांमधून "पश्चिमेचा गार वारा" आपल्या पर्यंत हे दोघ असे घेऊन येतात कि आपण रोमांचित होऊन जातो … 

उसळती हृदयात माझ्या, अमृताच्या धूंद लाटा
तू किनार्‍या सारखा पण कोरडा उरलास का रे


मिलनाच्या कल्पनेनेच माझ्या हृदय उचंबळून येत आहे आणि तू मात्र असा विरक्त का भासतो आहेस?? 
कवीने किती विचारपूर्वक शब्द दिले आहेत पहा … मनातल्या भावनांना लाटांचे रूपक देताना प्रियकराच्या प्रतिसादाला कोरड्या किनार्याची समर्पक उपमा दिली आहे … लाट किनार्याकडेच धावते आणि त्याच्याच मिठीत तिचा शेवट असतो, हो ना ?
 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मला आवडलेले या  गाण्याचे सगळ्यात मोठे वैशिष्ट कोणते असेल तर रूपकांचा सुंदर वापर… 
कोजागिरीचे चांदणे, तारकांच्या दीपमाला, रातराणीचा सुगंध आणि पश्चिमेचा गार वारा … कोणताही अश्लीलपणा न करता सुद्धा शृंगार गीत कसे करावे याचा क्लास काढावा सुधीर भटांनी … 

बागेश्री रागाचा  इतका सुंदर प्रयोग,  रागाची उत्तररात्रीच्या वातावरणात सहज मिसळून जाणारी साथ...  सगळं काही सुरेख जुळून आलेलं... 

 .कोणताही अश्लील शब्द न वापरता आणि खानदानीपणाचा पदर न सोडता सुद्धा इतकं सुरेख गाणं करता येतं…. पण त्या साठी लागते ती सुरांची-शब्दांची तपश्चर्या, प्रतिभेचा आशीर्वाद आणि कलेशी असलेली प्रामाणिकता … 
म्हणूनच जिथे सामान्य माणसं प्रेमभंग झाला कि दारूत बुडून जातात तिथे भटांसारखा एक मुशाफिर 
"कशा सुगंधी जखमा झाल्यात काळजाला,  केलेत वार ज्याने तो मोगरा असावा" 
असं अफाट लिहून जातात … 
वेदनेचं इतकं सुंदर वर्णन मी तरी नाही वाचलं कधी … 

आज कालच्या "बिडी जलैले जिगर से पिया" आणि "मुन्नी बदनाम हुई" च्या जमान्यात सुधीर भट, हृदयनाथ, लता-आशा, बाबूजी यांच्या प्रतिभेची उंची अजूनच मोठी वाटायला लागते … 



मी जेव्हा कविता वाचली तेव्हा लक्षात आलं  कि मूळ कवितेमधले शेवटचे कडवे रेकोर्डिंग करताना गाळले  होती… सहज कुतूहल म्हणून मी त्याचा पुढे शोध घेतला … 


ओठ अजुनी बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे… 


आधीची कडवी ऐकून मला सुद्धा हे निव्वळ शृंगारगीत आहे असेच वाटत होते… त्यातून स्त्रीत्वाची वेदनाच प्रकट होते … पण शेवटच्या कडव्यांचा अर्थ स्वतः भटांनी सांगितला आहे… 
प्रेयसी व्याकूळ पणे आपल्या प्रियकराला विनवते आहे आणि तो लाडिक पणे, लटक्या रागाने तिच्या कडे मुद्दाम दुर्लक्ष करतो आहे … म्हणून ती विवश होऊन त्याला आर्ततेने सांगते आहे, हे राजसा या सुंदर रात्रीचा आणि माझ्या तारुण्याचा असा अपमान नको करूस … हे सगळ तुझंच आहे, मी सुद्धा तुझीच आहे … तुझा हा लटका राग मी कसा घालवू ते सांग तरी… 


टीप :- 
हे गीत विरह गीत असल्याचा समज पसरवण्यात आला आहे … काही ठिकाणी हे गाणं - एक विधवा आपल्या मृत पतीच्या आठवणीत व्याकूळ होऊन गाते असा उल्लेख आहे … पण हे निव्वळ शृंगार गीतंच आहे … स्वतः हृदयनाथ मंगेशकरांनी त्याचा खुलासा केला आहे … 
https://www.youtube.com/watch?v=EXrwDBiUyOM


खाली मूळ गाण्याची आणि आरती अंकलीकर यांनी गायलेल्या version ची लिंक देत आहे… 
 https://www.youtube.com/watch?v=Cpig8qy9ASs
 https://www.youtube.com/watch?v=y1j3nP1E6cc


— © चिन्मय जोशी 

No comments:

Post a Comment