Tuesday, July 21, 2015

स्वातंत्र्यवीर सावरकर… १…


ज्यांचं नुसतं नाव ऐकून एक रसरशीत, धगधगतं यज्ञकुंड पहिल्याचा भास होतो असं तेजपुंज व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतिवीर सावरकर … सावरकरांच्या क्रांतिकारक म्हणून  केलेल्या कामाची प्रसिद्धी सगळीकडेच आहे… पण त्यांच्यामध्ये असलेला अभ्यासू साहित्यिक, प्रतिभा संपन्न कवी आणि मातृभाषेवर प्रेम करणारा एक निस्सीम भक्त आपण बघितलाच नाही …

 दोष आपला नाही… सावरकरांचे विचार आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आवाकाच इतका अफाट आहे कि नुसते क्रांतिकारी सावरकर किंवा समाजसुधारक सावरकर समजून घ्यायला एक जन्म कमी पडावा … आज मात्र मी बोलणार आहे ते महाकवी सावरकरांवर …

महाकवी हि पदवी, ती सुद्धा पु.ल. देशपांडे सारख्या विदुषी ने द्यावी यातच सगळं सामावलं आहे … महाकवी म्हणजे कारखान्यात बनवल्यासारख्या हजारोंनी कविता बनविणारा नव्हे!!  मोजक्याच पण आशयघन आणि प्रतिभा संपन्न कविता करणारे सावरकर आपल्या वेगळेपणाने उठून दिसतात… मातृभाषेवर जीवापाड प्रेम करून, असंख्य नवीन शब्दांची भर घालून तिलाच समृद्ध करण्याचं  भाग्य लाभलेला हा क्रांतिकारक विरळाच … आपल्यातल्या तरी किती जणांना

सावरकर म्हणाल कि पहिले डोळ्यासमोर येतं  ते "ने मजसी ने, परत मातृभूमीला… सागरा प्राण तळमळला" हे आर्त काव्य …

सावरकरांना लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत करून लंडनला पाठवलं होतं. टिळक आणि सावरकर, दोघांच्या बुद्धिमत्तेबद्दल तिथे आदर होता. बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन पदवी दिली न गेलेला तरूण म्हणून सावरकरांबद्दल सहानुभूती होती. तेथे त्यांनी भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलवणे, असे कार्य हातात घेतले आणि काही काळातच ते उदध्वस्त होण्याची वेळ आली होती.. तशात भारतात, घर मोडकळीला आल्याचा.. दोघं भाऊ पकडले गेल्याचा धक्का होताच. कुटुंबाची वाताहत आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत, हे कळणं... या अवस्थेत सावरकर त्या ब्रायटनच्या किनार्‍यावर बसले होते.
पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच, असं सांगता येत नाही.. हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार.. आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून आपण तडक मातृभूमीस जाऊ शकत नाही. या भावनेतून आलेले हे शब्द..
ने मजसी ने परत मातृभूमीला …

जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक उद्रेक सागरावर करीत आहेत.. ते सागरावर रागावलेले आहेत..

भूमातेच्या चरणतला तुज धूतां ।
मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ ।
सृष्टीची विविधता पाहू
त‍इं जननी-हृद्‌ विरहशंकितहि झालें ।
परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन ।
त्वरित या परत आणीन

‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस..मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास.. मित्र, मित्राला म्हणतो तसा.. की चल जरा फिरायला जाऊ.. दुसर्‍या देशात..त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात.. माझा विरह तिला होईल की काय ? अशी शंका आली.. पण तू तिला वचन दिलंस.. कि मी सर्वत्र संचार करतो आणि मी त्याला परत आणेन …

विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उदधरणी । मी
‘येईन त्वरे’ कथुन सोडिलें तिजला ।
सागरा, प्राण तळमळला

तुझ्या या वचनावर मी विश्वास ठेवला. तू जगभर.. सगळीकडे आहेस, त्यामुळे जगाचा तुला अनुभव असणार.. हा माझा तुझ्यावरचा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव घेता यावा ही इच्छा.. या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो.. आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो सुद्धा..
लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं ।
ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहू यापुढती ।
दशदिशा तमोमय होती

गुण-सुमनें मी वेचियली या भावें ।
की तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा

पोपट पिंजर्‍यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा, तसा मी फसलो आहे. तमोमय म्हणजे अंधःकारमय.. मार्ग दिसत नाही असं झालंय.
मी जे शिक्षण घेतले आहे, उदात्त आणि उन्‍नत अंगिकारण्याचा जो प्रयत्‍न केला आहे.. त्याचा जर मातृभूमीसाठी, तेथील सर्वसामान्य आणि पीडित जनतेसाठी जर उपयोग करता आला नाही तर ते सर्व व्यर्थच नाही का ?

ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबहि आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा, प्राण तळमळला…

मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही.)

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा
भुलविणें व्यर्थ हें आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे

किती सुंदर  विनंती आहे बघा…आई कशीही असली तरी प्रत्येक पुत्राला  तिचीच माया सर्वात प्रिय असते … इथल्या महालांमध्ये माझा  जीव रमत नाही … मला त्या आईच्या कुशीतल्या झोपडीची आठवण येते आहे … मला तिकडेच घेऊन चल…  मातृभूमिशिवाय मला हे राज्य नको, एकवेळ मी वनवास किंवा कारावास पत्करेन, पण ते तिच्या कुशीत ..


तुज सरित्पते, जी सरिता । रे
त्वद्‌विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला

 हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती.. हे काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते.…
सावरकर सागराला म्हणत आहेत.. माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतमातेचा मला विरह घडवशील तर.. हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल, अशी मी तुला शपथ घालतो.. मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.


यानंतर आता शेवटचं कडवं आहे. त्यात सावरकरांची आर्त आहे; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला.. गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे.

या फेन-मिषें हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा

 सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत.. तर त्याच्या लाटा तशाच उसळून, फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्याप्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात..

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ।
मज विवासनातें देशी

माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणार्‍या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणार्‍या सागरा..

तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबल न माझिही माता । रे
कथिल हे अगस्तिस आता । रे

विजनवास तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणार्‍या भित्र्या खलपुरूषा, ऐक..
माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस…
आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू…
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


हे गाणं ऐकताना भावनांच्या आर्त कल्लोळाचा आभास होतो… संस्कृतप्रचुर मराठी भाषा जणू भरजरी पैठणी लेऊन उभी राहिलेल्या कुलवंत स्त्री प्रमाणे वाटते …

सामान्य मर्त्य जीव निराशेच्या क्षणी दैवाला-नशिबाला दोष देत कुढत बसतात … व्यसनाधीन होतात … 
सावरकरांचे सगळे जीवनच अतिशय भव्य… मग त्याला त्यांचा आक्रोश तरी कसां अपवाद असणार ?
म्हणूनच प्रेम काव्य लिहिताना ते अगदी सहज 
शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥

असे लिहून जातात… 
तुमचे आमचे प्रेम फुले, चंद्र आणि नदीचा किनारा यांच्या आधाराने साकारते … पण सावरकर प्रेम करतात ते सुद्धा किती विराट आणि अफाट ते बघा … तुला १०० जन्म शोधत होतो, शत अर्ति व्यर्थ झाल्या … आणि वाट बघण्यामध्ये मी चक्क शेकडो सूर्यमालिकांच्या दीपमाला विझून गेल्या … 
ज्याची प्रेमाची कल्पना इतकी विराट असेल त्याची प्रतिभा कोणत्या जातकुळीची असेल ?? 

अशाच असामान्य प्रतिभेच्या पोटी अंदमानच्या काळकोठडीत महाकाव्य जन्माला येतं … आणि अशाच व्याकुळतेमध्ये सावरकर मध्ये असलेल्या अथांग सागरालाच आव्हान देतात  आणि  एक अजरामर काव्य लिहून येणाऱ्या किती तरी पिढ्यांना एक अमुल्य ठेवा  देऊन जातात … कदाचित यालाच प्रतिभा म्हणत असावेत… 

या सुंदर शब्दांना मंगेशकर कुटुंबाचा परिस स्पर्श झाला आणि शब्दांच्या वेदनांना सुरांचे अमूर्त कोंदण मिळाले… अशी सुंदर चाल देणे  हृदयनाथ आणि श्रीनिवास खळे  यांना सोडून कोणालाही जमलेच  नसते याची प्रचीती  आपल्याला हे गाणे ऐकताना जागोजागी  येते…  
उषा आणि लताचा एकत्र स्वर ऐकण्याची संधी म्हणजे दुधात केशरच … विशेष करून धृपद गाताना "सागरा" शब्दासाठी केलेली द्विरुक्ती केवळ अप्रतिम …  जशी सागराच्या लाटामागून लाटा याव्यात … 

या महाकवीच्या या सर्वांगसुंदर कलाकृतीने ऐकताना जर आपण भारावून गेलो नाही तरच आश्चर्य …  




Reference : http://www.aathavanitli-gani.com/Song/Sagara_Pran_Talamalala




No comments:

Post a Comment